चालु आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही पासून अर्थव्यवस्थेने हळूहळू गती घेतली आहे. आणि अर्थव्यवस्थाही बळकट होऊ लागली आहे. मात्र, वाढत्या महागाईच्या दबावाबरोबर कोरोना व्हायरसचे नवे रुप ओम्रीकॉनच्या माध्यमातून आव्हान उभे राहिले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली. आरबीआयने याबाबत दुसरा आर्थिक स्थिरता अहवाल सादर केला आहे.
या अहवालानुसार आरबीआय बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे की, या वर्षी एप्रिल-मे महिन्यात आलेल्या विनाशकारी कोरोना विषाणू महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत आहे. मात्र, जागतिक घटनाक्रम तसेच अलिकडे आलेल्या ओम्रीकॉन व्हायरसमुळ अर्थव्यवस्थेसमोर आव्हान उभे केले आहे. देशांतर्गत खप आणि गुंतवणूक यावर प्रगती अवलंबून आहे. मात्र, सध्याची स्थितीत कोरोना महामारीच्या आधीच्या स्तरावर आहे. वाढत्या महागाईमुळे चिंतेत भर पडल्याचे दास यांनी म्हटले आहे. अन्नधान्य आणि ऊर्जा या दोन्ही क्षेत्रातील किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँकांचा एनपीए सप्टेंबर २०२२ मध्ये वाढून ८.१-९.५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. सप्टेंबर २०२१ मध्ये तो ६.९ टक्के होता असे सांगत दास यांनी बँकांवरील दबाव स्पष्ट केला आहे.