पिलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ऊस दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी केली आहे. शेतीच्या उत्पादनासाठी वाढता खर्च पाहता त्यांनी शेतकरी सन्मान योजनेच्या निधीत राज्य सरकारनेही ६००० रुपये दिले जावेत अशीही मागणी केली आहे. यासोबतच शेतीच्या कामासाठी डिझेलवर प्रती लिटर वीस रुपयांचे अनुदान दिले जावे असा सल्ला वरुण गांधीनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघात ऊस हेच मुख्य पिक आहे. त्यामुळे यासाठीच्या उत्पादन खर्चात खूप वाढ झाली आहे. गेल्या चार सत्रामध्ये ऊस दरात फक्त १० रुपये प्रती क्विंटल वाढ झाली आहे. गेल्या सरकारांच्या तुलनेत ऊस बिले देण्यात वाढ झाल्याबद्दल मुख्यमंत्री योगी यांचे अभिनंदन करताना वरुण यांनी म्हटले आहे की, आजही ऊस बिलांची थकबाकी आहे. अशा स्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी, वाढता उत्पादन खर्च आणि महागाई पाहता मागणी लक्षात घेऊन सरकारने २०२१-२२ या हंगामासाठी ऊस दर किमान ४०० रुपये प्रती क्विंटल करावा. तात्काळ थकीत ऊस बिले द्यावीत.
गांधी यांनी लिहिले आहे की, राज्यातील शेती खंडाने करणारे शेतकरी आपला ऊस कारखान्यांना पुरवठा करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना गुऱ्हाळांना कमी दरात ऊस घालावा लागतो. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही ऊस पुरवठ्याची सुविधा निर्माण करावी. त्याशिवाय योग्य दरात स्वस्त बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन दिली पाहिजेत. उसावरील रोगांना आळा घालण्यासाठी ऊस विभागाला निर्देश देण्याची गरज आहे.
विज दरात कपात करण्याची आणि गहू तसेच भाताच्या खरेदीची व्यवस्था एमएसपीवर करावी अशी मागणीही खासदार वरुण यांनी केली आहे. यासाठी २०० रुपये प्रती क्विंटल बोनस देण्याची शिफारस त्यांनी केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link