लखनौ : विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने राज्यात ऊस दर वाढ करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. उसाच्या दराबाबत राज्य सल्लागार समितीने शेतकरी आणि साखर कारखानदारांसह सर्व संबंधित घटकांची एक उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्य सरकार लवकरच उसाची एसएपी वाढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या एका गटाशी बोलताना केली होती. आगामी गळीत हंगाम उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात २० ऑक्टोबर आणि उत्तर प्रदेशच्या मध्य भागात २५ ऑक्टोबरला सुरू होईल. उर्वरीत क्षेत्रामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हंगाम सुरू होणार आहे.
सध्याच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर २०१७ मध्ये उसाच्या एसएपीमध्ये १० रुपये प्रती क्विंटल वाढ केली होती. सध्या उसाची एसएपी ३२५ रुपये प्रती क्विंटल आहे. त्यामध्ये २०१७ पासून सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने विधानसभा आणि बाहेरही सरकारवर वारंवार टीका केली आहे. मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी गेल्या चार वर्षापासून एसएपीमध्ये सुधारणा झाली नसल्याने आता दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी केली. मात्र, साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी याला तीव्र विरोध केला. कारखानदारांच्या म्हणण्यानुसार, प्रती क्विंटल ४०० रुपये दर हा कारखानदारांना अडचणीचा ठरणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link