माता वैष्णोदेवी मंदिरात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांपैकी चौघेजण उत्तर प्रदेश, दोघेजण दिल्ली तर हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अद्याप चार जणांची ओळख पटली नाही. जखमी झालेल्या भाविकांना बाणगंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करुन जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले आहे. मी त्यांना या घटनेबाबत माहिती दिली आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने मृत झालेल्या भाविकांपैकी आठ जणांची नावे जाहीर केली आहेत. जखमी झालेल्या भाविकांची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे. चौघांची ओळख पटली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.