मुंबई : महाराष्ट्रात पावसाची शक्यता लक्षात घेऊन पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी येथे शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून मुंबई हवामान केंद्राने यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर २० ऑगस्टला अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि भंडारा येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, संततधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात एक जूनपासून अतिवृष्टी आणि पुरासारख्या घटनांमध्ये १२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला जात आहे. शुक्रवारी मुंबईत कमाल ३१ तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमान राहील. आकाश ढगाळ राहील आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यात कमाल २९ तर किमान २२ अंश सेल्सिअस तापमान असेल. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. नागपुरात कमाल ३३ तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमान राहील. काही काळ पाऊस पडू शकतो. नाशिक, औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहिल.