कोल्हापूर : जिल्हयातील ट्रक वाहतूकदारांच्या लढ्याला यश आले असून ज्याचा माल त्यानेच हमाली द्यावी, म्हणजे ज्याच्याकडे मालउतरला जाईल त्यानेच हमाली द्यावी. असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. यामुळे ट्रक वाहतूकदारांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. या आदेशाची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
ट्रक वाहतूकदारांच्या ‘ज्याचा माल, त्याची हमाली’ या मागणीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पाडली. यावेळी देसाई बोलत होते.
या बैठकीला साखर, सिमेंट व्यावसायिक उपस्थित होते; तर कांदा, बटाटे असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. तसेच ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचा या मागणीला विरोध असल्याने तेही आले नाहीत. मालवाहतुकीसंदर्भातील धान्य व्यापारी वगळता ९५ टक्के घटकांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे यावेळी मान्य केले.
यावेळी साहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, धान्य व्यापारी असोसिएशनचे प्रदीप कापडिया, पी. जी. मेढे, हमाल पंचायतचे कृष्णा चौगले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.