सांगली : पावसाने दडी मारल्याने त्याचा थेट परिणाम आडसाली लागणीवर झालेला दिसत आहे. पावसाअभावी जिल्ह्यात आडसाली ऊस लागवड खोळंबली आहे. आतापर्यंत केवळ २ हजार ६६६ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. रोपांची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे आडसाली हंगामातील उसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.
अग्रोवनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत उसाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. आडसाली ऊस लागवडीचा कालावधी जुलै-ऑगस्ट आहे. वारणा-कृष्णा नदीकाठच्या भागात मेच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्यात ऊस लागवड केली जाते. दरवर्षी वळीव पावसानंतर लागवडीपूर्व मशागती पूर्ण केल्या जातात. त्यानुसार शेतकरी लागवडीसाठी नियोजन करतो. मात्र, यंदा वळीव पाऊस झाला नाही. त्यामुळे लागवडपूर्व मशागती खोळंबल्या.कृष्णा आणि वारणा नदीतील पाण्याची पातळी कमी आहे. विहिरी, कूपनलिकांमधील पाणीपातळी घटली आहे. मात्र, त्यामुळे नवीन लागवड करण्यापेक्षा उभा असलेला ऊस जगवण्यासाठी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदा आडसाली ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.