साओ पावलो: ब्राझील गेल्या ९१ वर्षातील सर्वात गंभीर दुष्काळाचा सामना करीत आहे. सरकारने याबाबत इशारा दिला आहे. दुष्काळाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन खालावण्याची भीती आहे.
गेल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत ब्राझीलच्या खाण आणि उर्जा मंत्रालयाने नियुक्त केलेल्या एका एजन्सीने देशातील पाणी व्यवस्थापन आयोगाला पराना नदीखोऱ्यात दिर्घकाळ दुष्काळाचा फटका बसलेल्या मध्य आणि दक्षिण विभागातील पाणी स्थितीचा आढावा घेण्याची शिफारस केली आहे. कृषी मंत्रालयाच्या एका एजन्सीने जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी आपला पहिला आपत्कालीन दुष्काळ अॅलर्ट जारी केला आहे. या कालावधीत ब्राझीलच्या पाच राज्यांत पावसाचे प्रमाण कमी राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पूर्ण ब्राझीलमध्ये पावसाची कमतरता राहील. त्यामुळे कृषी उत्पादने, पशूधन आणि विजेच्या निर्मितीला फटका बसेल असे अनुमान आहे. कारण ब्राझीलमध्ये विजेसाठी जलविद्युत प्रकल्पांचा अधिक वापर केला जातो.