पुणे / सातारा : राज्यात गेल्या साधारणपणे दोन महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस वाळू लागला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना व कारखानदारांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने साखर हंगाम एक नोव्हेंबरपूर्वीच सुरू करण्याचे आदेश काढावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रमुख पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे. चालू वर्षात पाऊस सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमी झाल्यामुळे उस शेतीचे नुकसान झाले आहे. यंदा उसाचे उत्पन्न निम्याने घटणार आहे. दुष्काळाची परिस्थिती पाहता उसाच्या शेतीचे पाणी सरकार लोकांना पिण्यासाठी देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस वाळून जाईल. त्यामुळे राज्य सरकारने गळीत हंगाम एक नोव्हेंबरपूर्वी सुरू करणे आवश्यक आहे.
चालू वर्षात रिकव्हरी कमी झाली, तरीही साखरेला चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे कारखान्यांचा तोटा होणार नाही. यासाठी सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर व १५ जानेवारीपर्यंत येणाऱ्या उसाचा गळीत हंगाम संपवणे गरजेचे आहे. अन्यथा, १५ जानेवारीनंतर शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार नाही. ऊस वळून गेलातर त्याचा तोटा शेतकऱ्यांना व कारखानदारांनाही सोसावा लागणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.