गेल्यावर्षीच्या शंभर रुपयांच्या हप्त्यासाठी साखर अडवणार : राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर : मागील थकीत पैसे घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारखानदारांनी तातडीने शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. ते पैसे आमच्या हक्काचे आहेत. आणि साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून गतवर्षीचा १०० रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी केला. याप्रश्नी लोकसभा निवडणुका झाल्यावर साखर अडवणार आहे अशी घोषणा त्यांनी बुधवारी अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील शेतकरी मेळाव्यात केली.

माजी खासदार शेट्टी म्हणाले की, जिल्ह्यातील साखर कारखानदार माझ्या विरोधात एकवटले आहेत. गेल्या ५ वर्षांत मी स्वस्थ बसलो नाही. सर्वसामान्यांची हक्काची लढाई लढत आलो आहे. गेली ३० वर्षे शेतकरी चळवळ चालवत आलो आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची वाट लागली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी त्यावेळी वाऱ्यावर सोडले. महायुती व आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची पिळवणूक झाली आहे. यावेळी प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, शैलेश आडके, विठ्ठल मोरे यांची भाषणे झाली. सहदेव चौधरी, सचिन शिंदे, आप्पा पाटील, पोपट अक्कोळे, महावीर गिरमल, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here