जी 20 देशांनी हवामान बदल आणि जैवविविधतेची हानी या परस्परांशी संबंधित समस्यांवर संयुक्त प्रयत्नांद्वारे एकत्रितपणे उपाय शोधणे अत्यावश्यक : कपिल मोरेश्वर पाटील

“जैवविविधता आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे परिणाम जागतिक स्तरावर स्पष्टपणे दिसत असून विकासाची गती कायम राखण्यासाठी तसेच लोककल्याण आणि समृद्धीला चालना देण्याच्या मार्गात महत्त्वपूर्ण अडथळे निर्माण करत आहेत. म्हणूनच संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रयत्नांद्वारे हवामान बदल आणि जैवविविधतेची हानी या परस्परसंबंधित समस्यांवर जी 20 देशांनी एकत्रितपणे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. भारताचे जी 20 अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृतीभिमुख धोरणाबद्दल वचनबद्ध आहे,” असे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी सांगितले.

जी 20 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे उद्घाटनपर भाषण झाले. कपिल मोरेश्वर पाटील यांनी पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाने हवामान बदल आणि पर्यावरण समस्या या क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केले. समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या भव्य यशाबद्दल तसेच ओशन 20 संवाद मधील अर्थपूर्ण चर्चेबद्दल त्यांनी कार्यगटाचे अभिनंदन केले.

ते म्हणाले की हा कार्यगट संकल्पना आधारित प्राधान्यक्रमांमध्ये अर्थपूर्ण परिणाम साधण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे आणि सर्वसहमतीने संप्रेषण तयार करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी ग्रामीण समुदायांना सहभागी करून घेण्याच्या महत्त्वाकडे लक्ष वेधून पाटील म्हणाले, “शाश्वत विकास साधण्यासाठी आपण केवळ शहरी केंद्रांवरच नव्हे तर आपल्या ग्रामीण समुदायांचे कल्याण आणि प्रगतीकडेही लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागाला हवामान बदलाच्या सर्वाधिक फटका बसू शकतो. पावसाचे बदलते स्वरूप, दुष्काळ आणि पाण्याची टंचाई, उष्णतेची लाट आणि वाढते तापमान आणि लहरी हवामानामुळे ग्रामीण समुदायांची उपजीविका , अन्न सुरक्षा आणि आरोग्यासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत.

निसर्गाच्या सान्निध्यात राहणे ही ग्रामीण आणि बिगर शहरी भागाची जीवनपद्धती आहे. भारत एक राष्ट्र म्हणून पारंपरिकपणे शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी ओळखला जातो. ही परंपरा कायम राखत आमच्या पंचायती राज संस्था नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना चालना देत असून ग्रामीण समुदायांना वनीकरण मोहीम, कचरा व्यवस्थापन आणि जलस्रोतांचे संवर्धन यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत आहेत.

या संदर्भात, हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायती राज मंत्रालय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाची प्रक्रिया राबवत आहे. यासाठी, ‘समग्र -सरकार’ आणि ‘समग्र -समाज’ दृष्टिकोनातून वेगवेगळ्या हितधारकांना एका मंचावर एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.” यासाठी त्यांनी व्हायब्रंट व्हिलेज असेंबली उपक्रम आणि पंचायतींना दिले जात असलेले प्रोत्साहन याचे उदाहरण दिले.

पृथ्वीचे सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सदस्य देशांमध्ये सहकार्य आवश्यक असल्याचे सांगून केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. भारताच्या जी 20 अध्यक्षपदाची संकल्पना विषद करताना ते म्हणाले, “अशा आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्याच्या उद्देशाने, वसुधैव कुटुंबकम’– एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, ही संकल्पना या गोष्टींना पुष्टी देते. पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाने हाती घेतलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून यश मिळवण्यासाठी भारताला सहभागी देश आणि संघटनांकडून पाठिंब्याची अपेक्षा आहे.”

आजच्या दिवसाच्या सुरुवातीच्या भाषणात, जी 20 इंडिया च्या अध्यक्ष आणि पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिव, लीना नंदन यांनी पहिल्या दोन ईसीएसडब्ल्यूजी बैठकींमधील तसेच या दरम्यान दृकश्राव्य माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांमधील सक्रीय सहभागा बद्दल उपस्थित प्रतिनिधींचे आभार मानले. सहयोगी आणि समावेशक राहण्याच्या दृढ संकल्पासह, त्यांनी सांगितले की, भारताच्या अध्यक्षतेखाली गेल्या तीन आठवड्यांमध्ये सर्व तीन प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करत गट चर्चांची मालिका आयोजित करण्यात आली, आणि याच्या परिणामांच्या दस्त ऐवाजांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सर्व जी 20 सदस्यांचा संपूर्ण सहभाग आणि वचनबद्धतेची प्रशंसा केली, आणि त्या पुढे म्हणाल्या की, त्यांच्या सहभागा मुळे अध्यक्षपदाच्या काळात विधायक प्रक्रिया पार पडली आणि चर्चा फलदायी ठरल्या. भारताच्या अध्यक्षतेखाली, कार्यगट आपल्या कामकाजाच्या शेवटच्या टप्प्याकडे जात आहे, या पार्श्वभूमीवर, सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक परिणाम सुनिश्चित करण्यासाठी, जी 20 देशांनी आपला सहभाग कायम ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.

ईसीएसडब्ल्यूजी ने आपल्या कार्यपद्धतीच्या केंद्रस्थानी सर्वसहमतीचा दृष्टिकोन ठेवला आहे. प्रतिनिधींच्या मंत्रिस्तरीय संभाषणाच्या मसुद्याचे मूल्यांकन करताना, नंदन म्हणाल्या की, ईसीएसडब्ल्यूजी च्या बैठकींच्या विविध टप्प्यांमधून पुढे जात असताना, ही चर्चा योग्य दिशेला नेण्यासाठी आणि यामधून मिळालेल्या उपाययोजना हाती घेण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी विषयासंबंधीच्या प्राधान्यक्रमांवर आतापर्यंत झालेल्या प्रगतीबद्दल माहिती दिली, आणि या विषयाशी संबंधित प्राधान्य क्रमांच्या परिणामांशी सदस्य देशांनी स्वतःला जुळवून घ्यावे, असे आवाहन केले.

दिवसाच्या शेवटी लीना नंदन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि प्रसार माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या, “ईसीएसडब्ल्यूजी मूर्त परिणाम सहज साध्य करण्यासाठी वचनबद्ध असून, अध्यक्षपदाची धुरा पुढे सोपवण्यापूर्वी यासाठी चांगला पाया तयार करेल. ईसीएसडब्ल्यूजी बैठकीदरम्यान झालेल्या चर्चा या वर्ष अखेरीला होणाऱ्या जी 20 नेत्यांच्या परिषदेसाठी उपयोगी ठरतील, अशी अपेक्षा आहे.”

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here