महाराष्ट्रात आतापर्यंत ५ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम समाप्त

मुंबई : महाराष्ट्रात चालू हंगामात मागील हंगामाच्या तुलनेत केवळ ५ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. गेल्या हंगामात १९ फेब्रुवारीअखेर २७ साखर कारखान्यांनी गाळप बंद केले होते. दरम्यान, या हंगामात साखरेच्या उताऱ्यातही किरकोळ वाढ दिसून येत आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, २०२३-२४ या हंगामात १९ फेब्रुवारी २०२४ अखेर राज्यातील साखरेचा उतारा ९.९१ टक्के आहे. तर गेल्या हंगामात समान कालावधीत साखर उतारा ९.८७ टक्के होता.

सोलापूर विभागातील एक साखर कारखाना, पुणे विभागातील एक साखर कारखाना, छत्रपती संभाजी नगर विभागातील दोन आणि नांदेड विभागातील एका साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. या हंगामात एकूण २०७ साखर कारखानदारांनी सहभाग घेतला. त्यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ८३४.६३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ८२७.२३ लाख क्विंटल (८२.७२ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात २११ साखर कारखान्यांनी गाळप केले होते आणि ९०८.२७ लाख टन उसाचे गाळप करून ८९६.५९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here