ऊस दरवाढीच्या मागणीसाठी मंड्या शहरात आठ तासांचा बंद

मंड्या : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंड्या शहरात आठ तासांचा बंद पाळून सरकारी स्तरावर आपला विरोध नोंदवला. राज्य सरकारने ऊसासाठी योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) प्रती टन ४५०० रुपये करावा अशी मागणी केली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद राहिले. कर्नाटक राज्य रयत संघाच्या (केआरआरएस) बॅनरखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी आणि विविध संघटनांनी बेंगळुरू-म्हैसूर राज्यमार्ग रोखून धरला. शेतकऱ्यांनी सांगितले की, ते सर. एम. विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्यासमोर गेल्या ४५ दिवसांपासून धरणे आंदोलन करीत आहेत. मात्र, राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकरी म्हणाले की, अलिकडेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंड्याचा दौरा केला होता. मात्र, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.

राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करताना, आंदोलनकर्त्यांनी बाईक रॅली काढली आणि आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन जनतेला केले. व्यापारी आणि व्यावसायिक संस्थांच्या मालकांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली. काही शेतकऱ्यांनी वाहने रोखली तर काहींनी बस, वाहनांसमोर झोपून आंदोलनाला पाठिंबा मागितला. बेंगळुरू-म्हैसूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला. महामार्गावर एक किलोमीटरहून लांब वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली. संजय सर्कलवर आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांनी मंड्याच्या उपायुक्त कार्यालयावर मोर्चा नेला. तेथे निवेदन दिल्यानंतर ते आंदोलनस्थळी परतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here